पुणे : ‘सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती निर्माण करण्यासाठी ‘क्वीक हील फाउंडेशन’ने महाराष्ट्र सायबर सुरक्षा विभाग आणि थिएटर अकादमीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘साय-फाय करंडक २०१८’ या एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी १६ डिसेंबर रोजी होणार आहे’, अशी माहिती क्वीक हील टेक्नॉलॉजीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ कैलाश काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी या स्पर्धेत पारितोषिक म्हणून देण्यात येणाऱ्या करंडकाचे अनावरणही करण्यात आले.
‘क्वीक हील टेक्नॉलॉजी’चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ कैलाश काटकर म्हणाले, ‘आयुष्यातील विविध धोक्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी भारतीय पुरेशी काळजी घेतात; मात्र डिजिटल सुरक्षेला त्यांच्याकडून तितकेसे महत्त्व दिले जात नाही. तुमची संवेदनशील माहिती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचते. त्यामुळे जागरुकता ही काळाची गरज आहे. साय-फाय करंडकाच्या या आवृत्तीद्वारे आम्ही डिजिटल धोक्यांसंदर्भात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. या धोक्यापासून स्वतःचे कसे रक्षण करावे याची माहिती देत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून क्वीक हील फाउंडेशनने सायबर सिक्युरिटी वाढविण्यासाठी शाश्वत उपक्रम हाती घेतला आहे.’
‘ऑगस्ट २०१८ मध्ये जाहीर झालेल्या साय-फाय करंडकाच्या दुसऱ्या आवृत्तीला राज्यभरातून भरपूर प्रतिसाद मिळाला होता. शंभरहून अधिक संघांनी सहभागी होण्यासाठी प्रवेशिका पाठविल्या होत्या. थिएटर अकादमीने अध्यक्ष व प्रसिद्ध नाट्य कलाकार प्रसाद पुरंदरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे, मुंबई, औरंगाबाद, कोल्हापूर, गोवा आणि नागपूर येथे विभागीय ऑडिशन्स घेतल्या. आता १६ डिसेंबरला होणारी अंतिम फेरी ‘सकल ललित कलाघर’आयोजित करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते रितेश देशमुख उपस्थित राहणार आहेत, तर प्रसिद्ध अभिनेते आनंद इंगळे आणि दिग्दर्शक विजय केंकरे साय-फाय करंडकाच्या अंतिम फेरीचे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. अंतिम फेरीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नऊ संघांची निवड केली जाणार आहे’, असेही त्यांनी सांगितले.
थिएटर अकादमीचे अध्यक्ष प्रसाद पुरंदरे म्हणाले, ‘समाजात बदल घडविण्यासाठी कला ही अतिशय मोठी भूमिका बजावते. लोकांना नवीन कल्पना व घडामोडी सांगण्यासाठी याचा अनेक वेळा वापर करण्यात आला आहे. साय-फाय करंडकाच्या माध्यमातून आम्ही क्वीक हील फाउंडेशनसोबत सायबर सुरक्षेची गरज समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. अंतिम फेरीतील विचार करायला लावणाऱ्या नाटकांमुळे सायबर सुरक्षेसंदर्भात जनजागृती वाढायला मदत होईल. अशी आम्हाला खात्री वाटते.’